महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१ मे । विद्यार्थी, शिक्षकांची आणि पालकांची ऑनलाईन वर्गातून मुक्तता झाली असून राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना उद्या 1 मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्टीनंतर 14 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला (2021-22) सुरुवात होईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी सांगितले.
पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गेन्नती देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर अनेक शिक्षक संघटना आणि विद्यार्थी, पालकांनी ऑनलाईन वर्ग बंद करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार 1 मे ते 13 जूनपर्यंत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी असेल. त्यानंतर 14 जूनपासून विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा सुरू होतील, असे जगताप यांनी स्पष्ट केले. विदर्भातील तापमानाची स्थिती पाहता येथील शाळा 28 जूनपासून सुरू होतील.
सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे नवीन वर्षात शाळा सुरू करण्याबाबत जूनमधील कोरोनाची परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल. राज्य सरकार कोरोना निर्बंधाविषयी वेळोवेळी जे आदेश जारी करतील त्यानुसार शाळांना सूचित करण्यात येईल, असेही जगताप यांनी सांगितले.