महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. १० मे । टीम इंडिया ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) पाच टेस्ट मॅचची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे. टीम इंडियाची निवड होताच ही मालिका कोण जिंकणार? यावर चर्चा सुरु झाली आहे. भारताचा माजी कॅप्टन राहुल द्रविड (Rahul Dravid) यानं याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखालीच भारतानं 2007 साली इंग्लंड विरुद्ध शेवटची टेस्ट मालिका जिंकली होती.
राहुल द्रविडनं एका वेबिनारमध्ये बोलताना टीम इंडिया ही मालिका 3-2 नं जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. “माझ्या मते यंदा भारताला सर्वोत्तम संधी आहे. भारतीय टीम या मालिकेसाठी सज्ज असेल. ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका जिंकल्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. खेळाडूंना एकमेकांवर विश्वास आहे. तसंच आपले काही खेळाडू यापूर्वी इंग्लंडमध्ये खेळले आहेत. आपली बॅटींग अनुभवी असून भारत ही मालिका 3-2 नं जिंकू शकतो.” असं मत द्रविडनं सांगितलं. या मालिकेत अश्विन आणि जडेजा हे दोन्ही स्पिन बॉलर्स खेळू शकतात. ते दोघं बॉलिंगप्रमाणे बॅटींगमध्येही मोलाचं योगदान देत आहेत, असं द्रविडनं सांगितलं.
राहुल द्रविडनं यावेळी इंग्लंडच्या टीमबद्दलही त्याचं मत सांगितलं. “इंग्लंडचे फास्ट बॉलर्स चांगले आहेत. त्यांच्याकडं याबाबत अनेक पर्याय आहेत. जो रुट सारखा जागतिक स्तरावराचा बॅट्समन आहे. त्याचबरोबर बेन स्टोक्स देखील आहे. त्याच्या विरुद्ध अश्विननं चांगली कामगिरी करायला हवी. त्यांच्यामधील लढत लक्षवेधी असेल. भारतामध्ये अश्विननं स्टोक्स विरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. येत्या मालिकेत देखील ही चांगली लढत असेल.” असं भाकीत द्रविडनं व्यक्त केलं आहे.