महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. १० मे । भारतात सोने विक्रीसाठी अक्षय तृतीया आणि गुढीपाडवा हे शुभ दिवस मानले जातात. मात्र यंदा सलग दुसऱ्या वर्षी दुकानं बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वेलर्स काहीसे नाराज आहेत. कारण मागील वर्षी देखील याच कालावधीत दुकानं बंद होती. एएनएमओएल (ANMOL) चे संस्थापक ईशू दतवानी यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी बहुतांश दागिने विक्रेत्यांची उलाढाल 70 टक्क्यांहून अधिक प्रमाणात घटली आहे. ज्योतिष ग्रह आणि नक्षत्रांनुसार, अक्षय तृतीयेला सोनं खरेदी केल्यास व्यक्तीच्या जीवनात सुख समृध्दी येते. तसेच सोन्याची तुलना सूर्यासोबत केली जाते. अक्षय तृतीयेला सूर्य सर्वाधिक तेजस्वी असतो. सोने खरेदी ही शक्ती आणि ताकदीचं प्रतिक मानलं जातं. सोन्याला नेहमीच बहुमूल्य धातू आणि धन समृद्धीचे प्रतीक मानलं गेलं आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेला सोनं खरेदी शुभ मानली जाते.
गतवर्षी म्हणजेच मार्च 2020 मध्ये सोने 38,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. हेच दर आता 45,000 रुपयांवर पोहोचले आहेत. याचाच अर्थ गत 1 वर्षात सोन्याने सुमारे 17 टक्के रिटर्न दिला आहे. गत 5 वर्षांचा विचार करता सोन्यातून 61 टक्के रिटर्न मिळाला आहे. मार्च 2016मध्ये सोन्याचे दर 28,000 प्रति 10 ग्रॅम होते.सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची दुसरी लाट आणि लग्न समारंभाचा हंगाम यामुळे सोन्याला मागणी वाढत आहे. यामुळे येत्या वर्षा अखेरपर्यंत सोन्याचे दर पुन्हा 52,000 रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. जर कोणी गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक (Investment) करु इच्छित असेल तर हीच वेळ योग्य आहे. जर सोन्याची मागणी 20 टक्क्यांनी वाढली तर सोन्याच्या दरात 1000 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढ होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.