महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।मुंबई । दि. १० मे । अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याबरोबरच दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासंदर्भात घेण्यात येणाऱया सर्वेक्षणाला शाळा आणि विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थी, शाळांना अभिप्राय देण्यासाठी 11 मे मध्यरात्रीपर्यंत मुदत वाढवली आहे.
दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा विचार करण्यात येत आहे. त्याचबरोबर दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे याविषयीही शालेय शिक्षण विभागाकडून ऑनलाइन सर्व्हे केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 14 हजार 379 माध्यमिक शाळांनी दहावी अंतर्गत मूल्यमापनाची माहिती भरली आहे तर दहावीच्या 2 लाख 14 हजार 166 विद्यार्थ्यांनी अकरावीच्या सीईटीबाबत सर्वेक्षणामध्ये आपले मत व्यक्त केले आहे. या सर्वेक्षणात विद्यार्थी 11 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मत देऊ शकतील.