महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।मुंबई । दि. १० मे । सर्वेच्च न्यायालयाने खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी प्रत्येक राज्यात सुरू होईपर्यंत एकाही पालकाने वाढीव फी भरू नये, असे आवाहन इंडिया वाईड पेरेंटस् असोसिएशनसह राज्यातील इतर पालक संघटनांनी केले आहे.
नवीन शैक्षणिक सत्रासाठी फी आकारणी अनेक शाळांनी सुरू केली असून त्यात मोठय़ा प्रमाणात फीवाढ करण्यात आली आहे, शिवाय पालकांनी तक्रारी केल्या तर मुलांना शाळेतून काढू, अथवा निकाल रोखून धरू अशा धमक्या दिल्या जात आहेत. नुकताच सर्वेच्च न्यायालयाने फीसंदर्भात दिलेल्या निर्णयामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला असल्याने त्या निर्णयाची अंमलबजावणी होईपर्यंत एकाही पालकाने फी भरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना असोसिएशनच्या वतीने पत्रही लिहिण्यात आले आहे. शैक्षणिक संस्थांच्या नफेखोरीवर सर्वेच्च न्यायालयाने भूमिका घेतली असून शाळांना फी कपात करण्याची सूचना केली आहे.