महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि. ११ मे । गेल्या काही दिवसांपासून दिवसागणिक कोरोनाबाधितांचा तसेच मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत होता. गेल्या 24 तासांत तो खाली आला आहे. दिवसभरात 3 लाख 66 हजार 161 नवे बाधित आढळून आले, तर याच कालावधीत 3 हजार 754 जणांचा मृत्यू झाला. याआधी दररोज मृतांचा आकडा 4 हजारांवर जात होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी ही माहिती दिली.
विशेष म्हणजे, गेल्या 10 दिवसांत 32 लाख 86 हजार 804 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्याही या काळातील नवबाधितांच्या आकड्याच्या जवळ पोहोचलेली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 3 लाख 28 हजार 680 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. योग्य उपचार तसेच रुग्णांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे कोरोनातून पूर्णपणे मुक्त होता येते, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. देशातील आजअखेर रुग्णसंख्या 2 कोटी 26 लाख 62 हजार 575 पर्यंत पोहोचली आहे.
यातील 1 कोटी 86 लाख 71 हजार 222 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर 37 लाख 45 हजार 237 रुग्णांवर (16.53 टक्के) उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत 2 लाख 46 हजार 116 कोरोनाबाधितांचा (1.09 टक्का) मृत्यू झाला आहे. यातील अनेकांना अन्य आजारही होते. सोमवारी देशाचा कोरोनामुक्ती दर 86.39 टक्क्यांवर पोहोचला आहे.
देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 83 टक्के रुग्ण हे 13 राज्यांमध्येच आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 6 लाख 18 हजार 70 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कर्नाटकात 5,64,505, केरळमध्ये 4,23,863, उत्तर प्रदेश 2,33,981, राजस्थान 2,00,189, आंध्र प्रदेश 1,90,632, तामिळनाडू 1,44,547, गुजरात 1,39,614 सक्रिय रुग्ण आहेत. उर्वरित 1 लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण छत्तीसगड, पश्चिम बंगाल, हरियाणा, बिहार तसेच मध्य प्रदेश या राज्यांत आहेत.