महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १८ मे । गेल्या वर्षी धडकलेले “निसर्ग’ चक्रीवादळ आणि कोरोनापाठोपाठ रविवारपासून घोंघावत असलेल्या “तौक्ते’ चक्रीवादळाने कोकणाचे कंबरडे मोडले. निसर्गाच्या या संकटाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेती आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान केले. वीज ठप्प असल्याने घराघरात अंधार आहे. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी गावागावात नागरिकांनी जागता पहारा दिला. सोमवारी “तौक्ते’ पुढे सरकल्यानंतर ३० तासांनंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. निसर्ग नेहमी आमच्यावरच का कोपतो? असा येथील नागरिकांना प्रश्न पडलाय.
“तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात झालेल्या परिणामांचे वार्तांकन करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधी कोकणात आहेत. हे चक्रीवादळ किनारपट्टीहून १५० ते २०० किलाेमीटर समुद्रात असल्याने त्याचा फार फटका बसणार नाही, असा ग्रामस्थ आणि प्रशासनाचा कयास होता. प्रत्यक्षात यामुळे मोठे नुकसान झाले आहे