महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २६ मे ।कोरोना संसर्गामुळे निर्यातीत आलेल्या घसरणीत घटत्या किमतीचा फटका सोसणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरातमधील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या आठवड्यात ओढवलेल्या तौक्ते वादळाने मोठा तडाखा दिला. वादळामुळे झाडांवर लगडलेला ७५ टक्क्यांहून जास्त आंबा पडून मातीमोल झाला.
वादळानंतर अचानक आंब्याची आवक वाढणे आणि गुणवत्तेवर परिणाम झाल्याने केसर आंब्याची सर्वात मोठी बाजारपेठ तलालामध्ये केसर आंब्याचे भाव पडून ४-२० रु.किलोपर्यंत खाली आले. दुसरीकडे, हापूस आंब्याची किंमतही २२०० रु. प्रतिपेटी(पाच डझन) घसरून हजार रुपयांवर गेली. वादळामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची “आर्थिक अढी’ विस्कटली आहे.
आंबा उत्पादकांनुसार, मार्चमध्ये कोरोनाचा दुसरा लाटेचा संसर्ग आणि अंशत: लॉकडाऊन लागल्याने त्यांना आधीच ४०-५०% नुकसान होत होते. एअर कार्गोची सुविधा बंद झाल्याने निर्यातीवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी गुजरातच्या तलाला मंडीतून ३५०-४०० टन केसर आंब्याची निर्यात झाली होती. या वर्षी ५०% घटून १५० टन आंबा निर्यात होण्याचा अंदाज आहे. देशाचे “हापूस हब’ म्हणून ओळख असणाऱ्या कोकणात ७५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आंब्याचे जवळपास ४५% पीक आधीच काढले होते. वादळामुळे ४०% आंबा जमिनीवर पडला. झाडांवर आता १५ टक्के आंबा शिल्लक आहे.