गिरीश कुबेरांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही’, छावा स्वराज्य सेना आक्रमक

Spread the love

‘रेनिसान्स स्टेट’ या पुस्तकावर बंदी घालावी !

लेखक कुबेर, प्रकाशक हार्पर कोलिन्स यांच्या विरोधात संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा

महाराष्ट्र 24 । पुणे । विशेष प्रतिनीधी ।

वरिष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकामध्ये केले आहे. यावर बंदी घातली पाहिजे, अन्यथा ‘गिरीश कुबेरांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही’, कुबेरांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी छावा स्वराज्य सेना आक्रमक झाली असून, लेखकावर व प्रकाशकावर ताबडतोब गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलीमा पवार, पोलिस सहाय्यक आयुक्त सतीश गोळेकर व विशेष शाखा अधिकारी क्रांती पवार यांना भेटून त्यांच्याशी या पुस्तकाबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.

छावा स्वराज्य सेनेच्यावतीने सांगण्यात आले आहे. जोपर्यंत लेखक गिरीश कुबेर आणि प्रकाशक हार्पर कॉलिंस हा वादग्रस्त मजकूर पुस्तकातून काढून टाकत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने सर्व वितरकांना हे पुस्तक शासन दरबारी जमा करण्याचे आदेश द्यावेत. कुबेर हे एका दैनिकाचे संपादक म्हणून ओळखले जातात. ते अभ्यासू आहेत असेही बोलले जाते. ते छत्रपती संभाजी महाराजांविषयी अज्ञानातून लेखन करतील असे वाटत नाही. त्यामुळे कुबेर हे त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांविषयी असे बिनबुडाचे लिखाण करतात या मागे त्यांचा हेतू काय आहे ? याचीही चौकशी झाली पाहीजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संवेदनशील विषयामधे लवकरात लवकर लक्ष घालावे व योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा लेखक कुबेर आणि प्रकाशक हार्पर कोलिन्स यांच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रभर फिर्याद दाखल करु व संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन करु तसेच सरकारने सदर पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी छावा स्वराज्य सेनेच्यावतीने आम्ही करीत असल्याचे महिला प्रदेश अध्यक्षा शीतल हुलावळे यांनी महाराष्ट्र 24 ला सांगितले.

निवेदन देतेवेळी यांची होती उपस्थिती…
सदर निवेदन देताना छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक (पाटील), महिला प्रदेश अध्यक्षा शितल हुलावळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नागेश जाधव, पुणे शहर अध्यक्षा मेघा कदम, पुणे शहर युवक अध्यक्ष वैभव झोंबाडे, सदस्य सागर तिसगे आदी उपस्थित होते.

—————————————————
स्वराज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज साहित्यिक होते. संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. चारित्र्यसंपन्न, स्वराज्य निष्ठीत व स्वराज्यरक्षक असणाऱ्या राजावर रयतेचे सुद्धा प्रचंड प्रेम होत. महिलांचा सन्मान करणारे छत्रपती अशी संभाजी महाराज यांची ओळख आहे. अशा महान छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणे हा जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. अशा माथेफिरू, सवंग प्रसिद्धी पावलेल्या लेखकावर कारवाई झालीच पाहिजे.
शितल हुलावळे,
महिला प्रदेशाध्यक्षा, छावा स्वराज्य सेना

—————————————————

छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात अनाजीपंत यांनी ज्या पद्धतीने षडयंत्र करून छत्रपती संभाजी महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करण्याचे काम आजही कथा, कांदबऱ्या, मालिका व पुस्तकातून वेळोवेळी होत आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचे मावळे म्हणून आम्ही छत्रपतींची बदनामी सहन करणार नाही.
अरिफ शेख,
प्रदेश कार्याध्यक्ष, छावा स्वराज्य सेना

—————————————————

या पुस्तकामुळे आगामी काळात महाराष्ट्राला अस्थिरतेचा धोका निर्माण होऊ शकतो. कुबेर यांचे लेखन समस्त महाराष्ट्रवासियांची मान शरमेने खाली जाईल असेच आहे. आम्हा सगळ्या शिव-शंभू भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी. तसेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शासनाच्या ताब्यात घ्यावीत.
नागेश जाधव,
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, छावा स्वराज्य सेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *