महाराष्ट्र २४ – मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक आणि राज्यभरातल्या इतरही प्रमुख शहरात मनसेची मोर्च्याची जय्यत तयारी सुरु आहे. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात उद्या मनसेचा मुंबईत मोर्चा होणार आहे. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार आहे. यासाठी आझाद मैदानात मोठा स्टेजही बांधण्यात आला आहे. केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी धडकणार आहेत. राज्यभरातून 1 ते 2 लाख लोक मोर्चासाठी येण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर तयारी सुरु तर नाशिकमधून 10 हजार झेंडे मुंबईकडे रवाना केले आहेत.
मोर्चात सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते घरोघरी जाऊन पत्रकं वाटत आहेत. लोकांना मोर्च्यात सामील होण्याचं आवाहन केलं जातं आहे.मोर्चा कसा निघणार याची माहिती ते लोकांना देत आहेत. फिरत्या गाड्यांमधूनही लोकांना मोर्चात सामील होण्याचं आवाहन केलं जात आहे.
दरम्यान मोर्च्याच्या आधी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेत प्रवेश केलाय. पंकजा मुंढे यांचे मामा प्रकाश महाजनांनीही मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. राज ठाकरेंनी याआधीही रझा अकादमीच्या विरोधात मोर्चा काढला होता. पण यावेळचा मोर्चा हा सुनियोजित आहे. पक्षाच्या बदलेल्या धोरणाची किनार या मोर्चाला आहे. त्यामुळं हा मोर्चा अभूतपूर्व करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. आता उद्या राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.