महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात येणारी आषाढी एकादशीची महापूजा परंपरेप्रमाणे साजरी करण्यात येणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे महापूजा करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी, यासाठी प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिकाऱ्य़ामार्फत जिल्हाधिकाऱ्य़ाना पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शासकीय महापूजेचे निमंत्रण पाठविण्यात येणार असल्याचे आज झालेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत सांगण्यात आले.
आषाढी एकादशीबाबत चर्चा करण्यासाठी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर होते. या बैठकीला चार सदस्य उपस्थित होते. इतर सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले.
या बैठकीत आषाढी एकादशी परंपरेप्रमाणे साजरी करण्यावर एकमत झाले. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शासकीय महापूजेचे अधिकृत निमंत्रण देण्याचा ठराव करण्यात आला. तसेच मंदिर समितीची होणारी पाद्यपूजा, शासकीय महापूजा, शासनाने दिलेल्या मुख्य पालख्यांना परवानगी व त्यांची पांडुरंगाबरोबर देव आणि पादुका भेट, श्री विठ्ठलास 18 संस्थांचे नैवेद्य दाखविण्याची परवानगी, एकादशी दिवशी रथोत्सवास परवानगी, मानाच्या 195 फडकऱ्य़ाना दर्शनासाठी परवानगी, महाद्वार काल्यास परवानगी याबाबतचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्य़ाना पाठविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
आषाढी यात्रेनिमित्त 12 जुलैपासून श्री विठ्ठलाचा पलंग काढण्यात येणार आहे. मंदिर बंद असल्याने श्री विठ्ठलाचे 24 तास ऑनलाइन पद्धतीने दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या नियमानुसार मानाच्या पालख्या येतील त्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी मंदिर समितीची आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. या बैठकीस श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, संभाजीराजे शिंदे, शकुंतला नडगिरे, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.