महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जून ।मुंबई शहरासह पश्चिम उपनगरात पहाटेपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तुफान बॅटींग करणाऱ्या पावसाने मुंबईसह ठिकठिकाणी हजेरी लावली. यामुळे मुंबईतील हिंदमाता, परेल, सायन, किंग्ज सर्कल यासारख्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. (Mumbai Heavy Rain Maharashtra Weather Report warning issued by IMD)
मुंबईतील हिंदमाता, परेल, सायन, किंग्ज सर्कल या सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी साचले आहे. तर मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळे तिथे दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे वाहनांसाठी आणि नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
दरम्यान पुढचे 3 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये यलो अलर्ट घोषित केला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
एकीकडे मुंबई, नवी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर दुसरीकडे कोकण आणि पुण्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची एक सरही पडलेली नाही. आकाशात काळे ढग नसल्यामुळे सूर्यदर्शनही होत आहे. तर रायगड जिल्ह्यातही सध्या कुठेच फारसा पाऊस नाही.