महाराष्ट्र २४ ; नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रियांका यांनी म्हटले की, जनतेचा कौल हा नेहमी योग्यच असतो. हा आमच्यासाठी संघर्षाचा काळ आहे. आम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागेल आणि आम्ही तो करू, अशा भावना यावेळी प्रियांका गांधी व्यक्त केल्या.
२०१३ पूर्वी शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दिल्लीवर सलग १५ वर्षे राज्य केले. मात्र, २०१५ आणि यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षावर एकाही जागेवर विजय न मिळण्याची नामुष्की ओढावली आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेसच्या ६३ उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभव काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसच्या तुलनेत नवख्या असणाऱ्या ‘आप’ने सलग तिसऱ्यांदा दिल्लीची सत्ता काबीज केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने (आप) ७० पैकी ६२ जागा मिळवत दिल्लीत एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. तर आक्रमक प्रचाराने दिल्ली दणाणून सोडणाऱ्या भाजपला अवघ्या आठ जागांवरच विजय मिळवता आला.