कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जून । जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता दहावी-बारावीचे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पाहावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावांमधील १० वी तसेच १२ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे अशी माहिती प्रा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *