महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । आतापर्यंत ज्या लोकांना आजवर कोरोना झालेला नाही, त्यांच्यासाठी तज्ज्ञांनी महत्वाची माहिती सांगितली आहे. कोरोना काळात मास्क वापरणे, सोशल डिस्टन ठेवणे गरजेचे आहेच. त्याचवेळी हातही स्वच्छ साबणाने धूणे आवश्यक आहे. ज्यांनी लस (Corona Vaccine) घेतलेली आहे, त्यांनीही कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आता अशात तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. आजवर ज्या लोकांनी कोरोनाला दूर ठेवले आहे. म्हणजेच कोरोना अद्याप झालेला नाही त्यांनी कमीत कमी एक डोस तरी घेतला पाहिजे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आता कोरोना नियंत्रणात येत आहे. पण तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ज्या लोकांना आजवर कोरोना झालेला नाही, त्यांनी या काळात कोरोना लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. जी स्थिती पुण्याची आहे, तीच दिल्लीची असल्याची दिसत आहे. पुण्यात करण्यात आलेल्या सीरो सर्व्हेमध्ये 80 टक्के लोक कोरोना होऊन गेल्याचे दिसले आहे. त्यांच्यामध्ये अँटीबॉडिज तयार झाल्या आहेत.
पुण्यानंतर अशीच परिस्थिती दिल्लीत आहे, असे सफदरजंग हॉस्पिटलचे कम्युनिटी मेडिसिनचे एचओडी डॉ. जुगल यांनी म्हटले आहे. 10 ते 20 टक्के लोकसंख्या अशी आहे की, ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. या लोकांना सर्वात आधी कोरोना लस देण्यात यावी, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. दरम्यान, पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नुकत्याच करण्यात आलेल्या सिरो सर्व्हेमध्ये 81 टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. त्यामुळे या नागरिकांमध्ये आता कोरोनाच्या अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत.