महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । मराठी चित्रपटसृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशा प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
ज्येष्ठ कलादिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येसंदर्भात व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ व निर्मात्यांना चित्रपट युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पोलीस विभागाकडून करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, विद्या चव्हाण, गृह विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, फिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर आदी उपस्थित होते.
या बैठकीला उपस्थित असलेले चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांनी या क्षेत्रात वाढलेल्या गुन्हेगारी व त्यांच्यावर वाढलेला दबाव आणि आपल्या समस्या व त्यांच्या मागण्या गृहमंत्र्यांकडे मांडल्या. या बैठकीला शिवसेना सचिव आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर, पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, कलादिग्दर्शक नितीन देसाई, मेघराज भोसले, बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
चित्रपटसृष्टीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करणे गरजेचे आहे. यापूर्वीच्या सर्व गुह्यांचे एकत्रीकरण करून दोषींवर कठोर कारवाई करावी, ज्यायोगे सर्वांवर वचक निर्माण होईल. आवश्यकता भासल्यास विशेष चौकशी समिती नेमावी. कामगार विभागाने या क्षेत्रातील कामगारांना थेट बँकांमार्फत वेतन अदा करण्यासाठी आवश्यक ती धोरणात्मक कार्यवाही करावी. कामगारांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये जागरुकता आणण्यासाठी नवीन धोरण तयार करावे अशा सूचना कामगार आयुक्तांना दिल्या. गृहविभागाच्या नियंत्रणाखाली सर्व संबंधित विभागाची एका स्वतंत्र समिती कायमस्वरूपी स्थापन करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.