महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । स्वतःचा पक्ष प्रत्येकजण वाढवत असतो. आम्हीही ते करत असतो. ते चुकीचे नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो, पक्ष एकत्र चालवत नाही. त्यामुळे त्यातून कोणताही गैरसमज आमच्यात नाही. एकसंधपणे आम्ही सरकार चालवत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज स्पष्ट केले. केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रावर गंडांतर शक्य नाही. त्या चर्चांमध्ये कुठलाच अर्थ नाही, असेही पवार म्हणाले.
बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. समान नागरी कायद्याबाबत न्यायालयाने केंद्राला काही सुचविले असले तरी याबाबत केंद्र सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत भाष्य करता येणार नाही. परंतु न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्र आता काय करतेय हे पहावे लागेल. आमचे त्याकडे लक्ष आहे, असे पवार म्हणाले.
केंद्राने बाजार समित्यांसाठी एक लाख कोटींची तरतूद केली असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, हा निर्णय चांगला आहे. मार्केट कमिटय़ांच्या सुधारणांसाठी, भांडवली गुंतवणुकीसाठी ही चांगली गोष्ट आहे. तर विधान भवनातील राडय़ाबाबत पवार म्हणाले, गोंधळ झाला. त्यावर विधानसभेने निर्णय घेत शिक्षा केली. आता ते कशाला जुने उकरून काढायचे. ज्यांनी चुकीचे काम केले असे विधानसभेला वाटले त्यावर त्यांनी एक वर्षाच्या शिक्षेचा निर्णय घेतला.