महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाचा कहर अद्याप सुरूच असून, मुंबईतील जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे. पावसाने रविवारी दुपारी उसंत घेतल्यामुळे लोकल सेवा पूर्ववत झाली होती. पण, पावसाचा रविवारी रात्रीपासून जोर वाढला. सोमवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस बरसत असून, लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. लोकल सेवा सकाळी १५ ते २० मिनिटे थांबवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सुरू झाली. पण, आता विक्रोळ ते कांजूरमार्ग या दरम्यानच्या रुळ पाण्याखाली गेल्यामुळे रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मुंबई, उपनगरांसह लागून असलेल्या जिल्ह्यांत मागील तीन-चार दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकला आहे. गुरुवारपासून बरसत असलेल्या पावसाचा शनिवारनंतर जोर वाढला. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने रविवारी दुपारपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले होते. दुपारनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पावसाचा जोर वाढला. दरम्यान संपूर्ण कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे आणि रायगड येथे पुढील ३ ते ४ तासाच्या दरम्यान तीव्र ते अति तीव्र पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
हवामान विभागाने १९ ते २3 जुलै रोजी महाराष्ट्रात जोरदार पावसाचा आज इशारा दिला आहे. संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागांत डी २,३ स्वरुपाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाची संततधार रविवारी रात्रीपासून कायम आहे.