महाराष्ट्र २४ ;नवी दिल्ली – यंदाचा अर्थसंकल्प हा दिशाहीन आणि निराशाजनक असल्याची टीका पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्या अशिमा गोयल यांनी केली आहे. १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र ‘बजेट’मध्ये दूरदृष्टीचा अभाव असल्याचे सांगत गोयल यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. गोयल यांच्या टीकेनंतर सोशल मीडियावर केंद्र सरकारला लक्ष्य केले जात आहे.
गोयल या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लगार समितीच्या अर्धवेळ सदस्या आहेत. त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर परखड मते मांडली आहेत. त्या म्हणतात की, संपूर्ण अर्थसंकल्पात ‘मंदी’बाबत अवाक्षरसुद्धा काढण्यात आले नसल्याबद्दल आश्चर्य वाटले. ‘बजेट’ म्हणजे महसुली उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल साधला जातो. मात्र यंदाचे एकूण बजेट निराशाजनक आहे, असे गोयल यांनी सांगितले. इंदिरा गांधी इन्स्टिट्युट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च या संस्थेतील व्याख्यानात बोलताना त्यांनी अर्थसंकल्पावर भूमिका मांडली.
केंद्रातील नवीन सरकारचा हा पाहिलाच पूर्ण अर्थसंकल्प होता, मात्र त्यात कुठेही सरकारची ठोस भूमिका दिसली नाही. देशाचा विकासदर दशकभराच्या नीचांकावर घसरला आहे. देशातील वस्तूंचा खप कमी झाला आहे. त्याचबरोबर जागतिक घडामोडींचा परिणाम भारतावर होत आहे. अशा परिस्थितीत ‘बजेट’मध्ये कोणतीच सुस्पष्ट भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे अर्थसंकल्प दिशाहीन झाल्याचे दिसून येते, असे गोयल यांनी सांगितले.