मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले महाराष्ट्र सैनिकांना आवाहन ; जितकी जमेल, तितकी मदत पूरग्रस्तांना करा, काम करताना स्वतःचीही काळजी घ्या;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत, अनेकांनी यामध्ये जीव गमावले आहेत. या संकट काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पत्र शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवघड परिस्थितीत जमेल तितकी मदत करा असे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले आहे.

राज ठाकरेंनी आपल्या ट्वीट करत आपल्या सैनिकांना संदेश दिला आहे. ते म्हणाले की, ‘माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. ह्या अवघड परिस्थितीमध्ये मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितके जमेल, तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी, असे आवाहन करतो. आत्ता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर जसजसा पूर ओसरेल, तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीने योग्य ती मदत तिथे पोहोचेल असे पाहावे. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी’ असा संदेश राज ठाकरेंनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *