महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । डोंगराखालील गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यात सांगितले. सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात वृक्षतोडीमुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याची चर्चा आहे. परंतु, ही घटना का घडली? याचा शोध घेण्यासाठी तज्ञांची मदत घेतली जाणार आहे. भविष्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडूच नये यासाठी डोंगराखालील गावांचे कायमचे पुनर्वसन करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. आत्तापर्यंत आपल्या जागा सोडायच्या नाहीत अशी लोकांची मानसिकता असल्याने असे पुनर्वसन रखडले. मात्र, आता जीव जावू लागल्याने सक्तीने पुनर्वसन कसे करता येईल याबाबत विचार करू, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सातार्यात पत्रकार परिषदेत दिली.
ना. अजितदादा पुढे म्हणाले, या दुर्घटनेनंतर पुनर्वसनाबाबत लोकांची मानसिकता बदलली आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून हे काम आता सुरू झाले आहे. ज्यांच्या जमिनी या भागात आहे त्यांच्याबाबत थोड्या अडचणी आहेत. परंतु, ज्यांच्या जमिनी नाहीत त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. तसेच ज्यांच्या या भागात जमिनी आहे त्यांचे दुसर्या ठिकाणी पुनर्वसन करून त्यांना शासनाच्या जमिनी देणे व त्यांच्या वैयक्तिक जमिनी शासनाकडे घेण्याबाबत विचार सुरू आहे.