महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका बघता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी विविध शहरातं आपला दौरा सुरू केला आहे. पुणे (Pune), नाशिक (Nashik) नंतर आता राज ठाकरेंनी ठाणे (Thane) गाठले. ठाण्यातील सीकएपी हॉलमध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी राज ठाकरेंनी संवाद साधला आहे. या संवादमध्ये पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचे कानही टोचले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना म्हटले की सोशल मीडियाचा वापर कमी करा. निवडणुकीच्या तयारीला लागा. ठाणे महानगरपालिकेत 130 नगरसेवक विद्यमान आहेत तेवढ्याच वार्ड शाखाध्यक्ष मला पाहिजेत जास्त वाढवत बसू नका, शाखा अध्यक्ष हाच पक्षाचा कणा आहे.
अजून एकमेकांशी हेवेदावे करू नका एकमेकांशी जोडून राहा. जे नवीन येतील, जे तिकिटासाठी येत असतील त्यांनी तिकीटासाठी येऊ नका. पक्षबांधणी नव्याने करा आणि एकमेकांशी वाद करायचा नाही. मनसे पक्ष कसा बळकट होईल यासाठी त्याचा विचार करा त्याच्यासाठी मेहनत करा असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
प्रभाग अध्यक्ष पद रद्द करणार आहे. प्रभाग अध्यक्ष पदी दुसरा पर्याय देणार आहे. पुण्यात जसा पर्याय निवडला तसाच ठाण्यात निवडणार, 25 दिवसांनी ठाण्यात देखील पर्याय निवडणार असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
रायगड दुर्घटनेत नुसते दौरै करणे योग्य नाही, त्यांच्या पर्यंत मदत पोहोचणे गरजेचे आहे. वादळी वाऱ्याबाबत राज्यात काहीच नियोजन नाहीये. ठाणे शहराची दुरावस्ता झालीये, मी लहान असताना ठाणे शहर कसे होते आणि आता कसे आहे? ठाण्यात टाऊन प्लॅनिंग नाहीये त्यांच्यामुळे अशा परिस्थिती उदभवत आहे. असं ही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचंही त्यांनी म्हटलं.