राहुलने ठोकला T20 World Cup टीममध्ये दावा,

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Sri Lanka) तिसऱ्या टी-20 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, याचसोबत भारताने टी-20 सीरिजही 2-1 ने गमावली. पहिली टी-20 जिंकल्यानंतर कृणाल पांड्याची (Krunal Pandya) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या 9 खेळाडूंना अखेरच्या दोन टी-20 खेळता आल्या नाहीत. खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे टीमचं संतुलन बिघडलं. तसंच खेळाडूंकडे अनुभवाची कमी असल्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला. तरीही लेग स्पिनर राहुल चहरने (Rahul Chahar) आपला प्रभाव पाडला. याचसोबत त्याने टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) टीममध्येही आपला दावा ठोकला आहे.

राहुलला श्रीलंका दौऱ्यात युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादवसारख्या (Kuldeep Yadav) अनुभवी स्पिनर्समुळे खेळण्याची फार संधी मिळाली नाही. तरीही त्याला आपली छाप पाडता आली. चहर वनडे सीरिजच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाचा भाग नव्हता, पण या दोन्ही मॅचमध्ये भारताचा विजय झाला आणि सीरिज आपल्या नावावर केली.

सीरिज जिंकल्यानंतर टीमने नव्या खेळाडूंना संधी दिली, या संधीचा राहुल चहरने फायदा करून घेतला. 10 ओव्हरमध्ये 54 रन देऊन त्याने 3 विकेट घेतल्या. अखेरच्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला तरी चहरने 76 रन करणाऱ्या आविष्का फर्नांडो, कर्णधार दासून शनाका आणि चमिका करुणारत्ने यांना आऊट केलं.

तिसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेच्या बॅट्समननी राहुल चहरला 6 फोर मारले, पण तरीही चहरने बॉलला फ्लाईट दिली, त्यामुळे चहर विकेट घेण्यासाठी बॉलिंग करत असल्याचं दिसून आलं.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये युझवेंद्र चहल टीममध्ये असल्यामुळे चहरला खेळण्याची संधी मिळाली नाही. अखेरच्या दोन टी-20 मध्ये चहल आयसोलेशनमध्ये गेल्यामुळे राहुलला खेळवण्यात आलं. या दोन्ही सामन्यांमध्ये राहुलने उत्कृष्ट बॉलिंग केली. दुसऱ्या टी-20 मध्ये त्याने 4 ओव्हरमध्ये 27 रन देऊन 1 विकेट घेतली.

सीरिजच्या अखेरच्या मॅचमध्येही तो सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. श्रीलंकेच्या तिन्ही विकेट घेण्यात त्याला यश आलं. 4 ओव्हरमध्ये 3.75 च्या इकोनॉमी रेटने 15 रन देत त्याने 3 विकेट पटकावल्या.

या कामगिरीमुळे चहरने टी-20 वर्ल्ड कपसाठीचा आपला दावा ठोकला आहे. चहरची स्पर्धा अनुभवी युझवेंद्र चहलसोबत आहे. मागच्या काही काळापासून चहल फॉर्ममध्ये नाही. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये 3 मॅच खेळून त्याने 10 रन पेक्षा जास्तच्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली होती. चहलचा हा फॉर्म बघता निवड समिती वर्ल्ड कपसाठी चहरचा विचार करू शकते. यंदाचा टी-20 वर्ल्ड कप ओमान आणि युएईमध्ये होणार आहे. त्याआधी आयपीएलही युएईमध्ये खेळवली जाईल. आयपीएलमधल्या कामगिरीवरही निवड अवलंबून असेल.

राहुल चहरने 5 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत. तर एकूण टी-20 करियरमध्ये त्याने 66 मॅच खेळून 82 विकेट मिळवल्या. टी-20 मध्ये त्याला एकदा 4 विकेट आणि एकदा 5 विकेट मिळाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *