महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट । टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुर्वणपदक मिळाले आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वांनीच सोशल मीडिया पोस्टद्वारे नीरजचे कौतुक केले. दरम्यान सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये काही मीम्स शेअर करत नीरजवर बायोपिक तयार केला जावा आणि त्यामध्ये कोणता अभिनेता असावा याबाबत चर्चा सुरु होती. नीरजने स्वत: यावर प्रतिक्रिया देत दोन अभिनेत्यांची नावे घेतली होती.
नीरज चोप्राने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बायोपिकमध्ये कोणता अभिनेता असावा यावर प्रतिक्रिया दिली. “जर माझ्यावर बायोपिक करण्याचं ठरवलंच तर माझ्या बायोपिकमध्ये मला हरियाणाचा रणदीप हुड्डाला पहायला आवडेल. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारही मला खूप आवडतो”, असे नीरज चोप्राने उत्तर देताना सांगितले. त्यावर आता अक्षय कुमारने प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय कुमारने नुकतीच न्यूज १८ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला नीरज चोप्रावरील बायोपिकविषयी विचारण्यात आले होते. तेव्हा तो म्हणाला, ‘लोक चर्चा करत आहेत की मी आतापासूनच प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली आहे. मला हे ऐकून हसू अनावर झाले होते.’ पुढे अक्षयने त्याच्या बायोपिकविषयी इच्छा व्यक्त केली. ‘नीरज चोप्रा गूड लूकिंग आणि हॅण्डसम आहे. माझ्यावर एखादा बायोपिक आलाच तर नीरज चोप्रा मुख्य भूमिकेत असेल’ असे अक्षय म्हणाला.
It’s a GOLD 🥇Heartiest Congratulations @Neeraj_chopra1 on creating history. You’re responsible for a billion tears of joy! Well done #NeerajChopra! #Tokyo2020 pic.twitter.com/EQToUJ6j6C
— Akshay Kumar (@akshaykumar) August 7, 2021
अक्षय कुमारने ट्वीट कर दिल्या शुभेच्छा
नीरजेन सुवर्णपदक जिंकल्यानंतर काही वेळातच बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंगमध्ये होता. नीरजला शुभेच्छा देत अक्षय कुमारने लिहिले की, “अखेर गोल्ड मिळालं…नीरज चोप्राने इतिहास रचल्याबद्दल त्याचे मनापासून अभिनंदन. तू कोट्यावधी लोकांच्या डोळ्यातील आनंदाश्रूचे कारण आहेस. खूपच सुंदर” या ट्विटमध्ये अक्षय कुमारने ‘गोल्ड’ हा शब्द इंग्रजीत कॅपिटलमध्ये लिहिला होता. ‘गोल्ड’ त्याच्या चित्रपटाचे नाव सुद्धा आहे.
भालाफेकपटू नीरज चोप्रा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला. ब्रिटिश भारताकडून खेळलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती. परंतु ते इंग्रज होते, भारतीय नव्हते. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरले.