महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ऑगस्ट । केंद्र सरकारने ‘खेलरत्न’ पुरस्कारातून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव बदलले होते. मात्र राज्य सरकारने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने आता आयटी क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना आणि पंपन्यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी यांच्या जयंतीदिवशी 20 ऑगस्ट रोजी पुढील वर्षीपासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जाईल. येत्या 20 ऑगस्ट रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे.
माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. त्यात महाराष्ट्रात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना हिंदुस्थानातील महिती व तंत्रज्ञानाचा पाया रचणाऱ्या राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयटी क्षेत्रातील पुरस्काराचे स्वरूप ठरविण्याचे काम महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई (महाआयटी) यांच्याकडे देण्यात आले आहे. यंदा 20 ऑगस्ट रोजी पुरस्काराची घोषणा होईल तर 30 ऑक्टोबर 2021 पूर्वी पुरस्कारासाठी संस्था निवडीचे निकष व अंतिम निवड करून पुरस्कार जाहीर करण्यात येईल, असे मंगळवारी काढलेल्या शासन आदेशात म्हटले आहे.