महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । पुढील पाच वर्षांत राज्यात सौरऊर्जेचा लखलखाट होणार आहे. औष्णिक वीज प्रकल्पांवरील अवलंबित्व कमी करतानाच विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी 2026पर्यंत तब्बल 17 हजार 385 मेगावॅटचे सौरप्रकल्प उभारण्याचा आराखडा ऊर्जा विभागाने तयार केला आहे. त्यासाठी जवळपास 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. दरम्यान, सदरच्या सौरऊर्जा प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा मुबलक वीज उपलब्ध होणार असून औद्योगिक ग्राहकांना कमी दराने वीज मिळू शकणार आहे.
औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना कोळसा जाळावा लागत असल्याने मोठ्या प्रमाणात होते. तसेच कोळशाच्या वाढत्या किमतींमुळे विजेचे दर वाढत आहेत. त्याची दखल घेत 2030पर्यंत एकूण वीज वितरणाच्या 30 टक्के वीज पर्यावरणपूरक सौर प्रकल्पातून घेण्याचे उद्दिष्ट ऊर्जा विभागाने ठेवले. त्याचाच भाग म्हणून पुढील पाच वर्षांत 17 हजार मेगावॅटहून अधिक क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा आराखडा तयार केला आहे. महावितरण आणि महानिर्मितीच्या माध्यमातून खासगी गुंवणूकदारांच्या सहकार्याने सदरचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार असल्याची माहिती ऊर्जा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.