महाराष्ट्र २४- नवी दिल्ली,-उत्तरप्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात 3 हजार टन सोनं आढळल्याची देशभरात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र हा दावा जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (Geological Survey of India) फेटाळला आहे. यूपीच्या सोनभद्र जिल्हा भूगर्भ शास्त्रज्ञांनी असं कोणतंही सोनं आढळलं नसल्याचा दावा त्यांनी पीटीआयशी बोलताना केला आहे.
जमिनीखालच्या 3 हजार टन सोन्याचा शोध जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला (GSI ) लागला असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. माध्यमांमध्येही त्या बद्दल अनेक बातम्या प्रसारीत झाल्या. जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची टीम 15 वर्षांपासून या भागामध्ये काम करत होती. 8 वर्षांपूर्वी या टीमने इथं सोनं असल्याच्या माहितीला पुष्टी दिल्याचाही दावा केला जात होता. उत्तरप्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात हे सोनं आढळल्याचा दावा केला जात होता. तर उत्तर प्रदेश सरकारने आता या कामात वेग घेतला असून हे सोनं काढण्यासाठी ई-लिलाव प्रक्रियेला सुरूवात केल्या असल्यापर्यंच चर्चा आणि बातम्या पोहोचल्या होत्या. मात्र या सगळ्या चर्चा आता फोल ठरल्या आहेत. असं कोणतंही सोनं आढळला नसल्याचा दावा पीटीआयला दिलेल्या माहितीत सोनभद्र जिल्हा भुगर्भ शास्त्रज्ञांनी केला आहे.
उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील हरदी भागामध्ये 6.46.15 टन तर सोन पहाडीमध्ये 2943.25 टन सोन्याचा साठा असल्याचा दावा करण्यात आला होता. ई-टेंडरिंगच्या माध्यमातून या ब्लॉकचे लिलाव केले जाणार असल्याचंही बोललं जात होतं. यासाठी सरकारने सात सदस्यांची समितीही स्थापन केल्याच्याही जोरदार चर्चा सुरू होत्या. मात्र आता या सोनं आढळल्याच्या दाव्यामधील हवा निघून गेली असून अजून पुढे काय माहिती समोर येते ते पाहावं लागणार आहे.