महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ सप्टेंबर । विराट कोहलीने भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ आगामी टी-२० वर्ल्डकपपर्यंत त्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. त्यानंतर टी-२०चे कर्णधार कोण असेल यावर सर्वांचे एकच मत आहे ते म्हणजे रोहित शर्मा होय. पण भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी एक रोखठोक वक्तव्य केले आहे.
महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या मते केएल राहुलकडे भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. भारतीय क्रिकेट संघाचा भावी कर्णधार म्हणून त्याला तयार करण्याची गरज आहे. विराटने टी-२०चे नेतृत्व सोडण्याची घोषणा केल्यानंतर गावस्कर यांनी हे वक्तव्य केले आहे.
ही एक चांगली गोष्ट आहे की बीसीसीआय पुढचा विचार करत आहे. भविष्याबाबत विचार करणे हे महत्त्वाचे ठरते. जर भारत नवा कर्णधार तयार करण्याचा विचार करत असेल तर केएल राहुलकडे पाहता येईल. त्याने चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडमध्ये देखील त्याची फलंदाजी चांगली होती. तो आयपीएल आणि ५० षटकाच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करतोय. त्याला कर्णधार केले जाऊ शकते.
राहुल आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार आहे. त्याने आयपीएलमध्ये शानदार नेतृत्व केले आहे. कर्णधारपदाचे ओझे त्याच्या फलंदाजीवर येत नाही. टीम इंडियाचा कर्णधार म्हणून त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.
विराटच्या राजीनाम्यानंतर टी-२० संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विराटच्या गैरहजेरीत रोहितने केलेले नेतृत्व आणि त्याची आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीमुळे कर्णधारपदासाठी तोच फेव्हरेट मानला जात आहे. तर उपकर्णधारपदासाठी ऋषभ पंत, राहुल आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू स्पर्धेत आहेत.