महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ सप्टेंबर । सप्टेंबर महिन्यात सुरुवातीचे दोन आठवडे राज्यभर जोरदार पाऊस ( Heavy rainfall in maharashtra) कोसळल्यानंतर मान्सूनने राज्यात उघडीप घेतली आहे. गेल्या आठवड्यात मारठवाड्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यानंतर आता गेल्या मागील चार-पाच दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर हळुहळू कमी झाला आहे. पुढील दोन दिवसही राज्यात पावसाची खूपच कमी शक्यता आहे. पण विकेंडनंतर राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.
रविवारी हवामान खात्यानं नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. दरम्यान याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी उर्वरित राज्यात मात्र कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. सोमवारी आणि मंगळवारी राज्यात पावसाचा किंचितचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
सोमवारी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहेत. तर मंगळवारी पालघर, अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या दोन दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदा परतीचा पाऊस लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपातील पिकं काढणीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. परतीच्या पावसामुळे दरवर्षी पिके पाण्यात जाण्याचा धोका असतो. पण यंदा परतीचा पाऊस लांबणार असल्याने पिकांची काढणी करता येणार आहे. यंदा 15 दिवस उशीरा राज्यस्थानमधून परतीचा पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही परतीचा पाऊस उशीरा दाखल होण्याची शक्यता आहे.