महाराष्ट्र 24 – नवी दिल्ली
दिल्लीतील हिंसाचारावर बुधवारी काँग्रेस कार्य समितीची बैठक झाली. बैठकीनंतर पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधींनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीतील हिंसाचारासाठी गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
खरे तर हे जाणूनबुजून केलेले षड्यंत्र आहे. भाजपचे नेते प्रक्षोभक वक्तव्य करून तिरस्कार व भीतीचे वातावरण निर्माण करू पाहत आहेत. त्याशिवाय दिल्ली सरकार देखील आपली भूमिका निभावण्यात अयशस्वी ठरले आहे. परिस्थिती गंभीर आहे. हिंसाचारावर तत्काळ कारवाई करण्याची गरज होती, असे सोनियांनी सांगितले. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पीडित भागात जाऊन लोकांंच्या भेटी घेतल्या पाहिजेत. सरकारने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे सुरक्षा दल तैनात करावे. शांतता समित्यांची स्थापना केली पाहिजे, अशी मागणी सोनियांनी याप्रसंगी केली. पत्रकार परिषदेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा, वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी यांचीही उपस्थिती होती. आंदोलनासाठी बसलेल्या लोकांबद्दल भाजप नेते कपिल मिश्रा यांनी लाजिरवाणे वक्तव्य दिले होते. या प्रकरणात भाजपने मौन धरले आहे. ही लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका प्रियंका गांधी-वढेरा यांनी केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. रक्ताने हात माखलेले लोक राजीनामा मागू लागले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.