दिवाळीनंतर सुरू होणार महाविद्यालये, 1 नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑक्टोबर । यंदा महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होईल. मात्र, प्रत्यक्षात महाविद्यालये दिवाळीनंतर सुरू होतील. तसेच लवकरच प्राध्यापक व प्राचार्य भरती केली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली.

अकृषक विद्यापीठांच्या कुलगुरूंची गुरुवारी मुंबईत बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय होईल, कोरोना टास्क फोर्ससोबत चर्चा करून त्याबाबतची एसओपी बनवली जाईल व मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर निर्णय होईल. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी यायचे की नाही हे त्यांनी ठरवायचे आहे. उपस्थितीची विद्यार्थ्यांना सक्ती केली जाणार नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व प्राचार्य भरतीला तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी प्राध्यापक भरतीची फाइल अर्थ विभागाकडे जाईल. राज्यात ३ हजार ७४ प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्या लवकरच भरण्याचे नियोजन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *