महाराष्ट्र २४- नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार आहे. सरकारला राजकारण आणि सोशल अजेंडे राबवण्यात अधिक रस असून त्यांना अर्थव्यवस्थेचे घेणं देणं नाही, असा टोला राजन यांनी लगावला आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी विकासदर घसरल्याबाबत केंद्र सरकारच्या दिशाहीन कारभारावर टीका केली. राजन म्हणतात की, सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस यश मिळवल्यानंतर केंद्र सरकार त्यांच्या पोलिटिकल अजेंड्याला महत्व देत आहे. अर्थव्यवस्थेच्या समस्या सोडवण्याऐवजी सरकारने त्यांच्या सोशल अजेंड्याला प्राध्यान्य दिल्यानेच अर्थव्यवस्थेची अशी दुर्दशा झाली आहे, असे राजन यांनी सांगितले.
सध्याची भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती दुर्दैवी आहे, असे खेदाने म्हणावं लागेत. केंद्र सरकार केवळ राजकारणात व्यस्त आहे. त्यामुळे आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. जर योग्य उपाययोजना केल्या तर अर्थव्यवस्था नक्कीच उभारी घेईल, असा विश्वास राजन यांनी व्यक्त केला. नुकताच तिसऱ्या तिमाहीचा विकासदर जाहीर झाला. ज्यात विकासदर ४.७ टक्के राहिला असून गेल्या सहा वर्षातील नीचांकी स्तर आहे.
वित्तीय क्षेत्रातील समस्या सोडवण्यात सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्याने आज आर्थिक वृद्धिचा वेग कमी झाला आहे, असे राजन यांनी म्हटलं आहे. त्यांनी नोटबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या सुमार अमंलबजावणीबाबत सरकारला दोषी धरलं आहे.