महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑक्टोबर । आयपीएल 2021 (IPL 2021) चे आता अखेरचे दोन सामनेच शिल्लक आहेत. आयपीएल संपल्यानंतर लगेचच 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. याआधी जम्मू-काश्मीरचा फास्ट बॉलर उमरान मलिकला (Umran Malik) टीम इंडियासोबत राहायला सांगण्यात आलं होतं, यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सचा फास्ट बॉलर आवेश खान (Avesh Khan) आणि कोलकात्याचा ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांनाही स्टॅण्डबाय खेळाडू म्हणून युएईमध्येच ठेवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने भारताच्या (India vs Pakistan) टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल.
निवड समितीच्या जवळ असणाऱ्या बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. ‘निवड समितीने आवेश खानलाही टीमसोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तो नेट बॉलर म्हणून टीमसोबत असेल. पण टीम मॅनेजमेंटला वाटलं तर ते आवेशचा मुख्य खेळाडू म्हणून टीममध्ये स्थान देऊ शकतात,’ असं सूत्राने सांगितलं.
आयपीएल 2021 मध्ये आवेश दिल्लीकडून खेळत आहे, या मोसमात त्याला 23 विकेट मिळाल्या आहेत. बुधवारी क्वालिफायर-2 च्या सामन्यात तो केकेआरविरुद्धच्या मॅचमध्येही खेळणार आहे.
आयपीएल 2021 मध्ये हर्षल पटेलच्या 32 विकेटनंतर आवेश खान सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा बॉलर आहे. ‘आवेश 142-145 किमी प्रती तासाच्या वेगाने बॉलिंग करतो. सपाट खेळपट्टीवर त्याच्या बॉलला चांगला बाऊन्स मिळतो. मागच्या काही काळापासून टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ त्याच्याकडे लक्ष ठेवून आहे,’ असं सूत्राने सांगितलं. आवेश खान भारताच्या टेस्ट टीमसोबत इंग्लंडलाही गेला होता. काऊंटी टीमविरुद्धच्या सराव सामन्यात आवेश खानचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता, त्यामुळे त्याला दौऱ्याहून परतावं लागलं.
पांड्याला बॅकअप म्हणून अय्यर
टी-20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बॅट्समन म्हणून खेळण्याची शक्यता आहे, कारण त्याच्या फिटनेसवर अजूनही प्रश्न आहेत. आयपीएलमध्येही पांड्याने बॉलिंग केली नाही. केकेआरचा ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यरने या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली. 8 सामन्यांमध्ये 38 च्या सरासरीने त्याने 265 रन केले, यात दोन अर्धशतकं आहेत. अय्यरचा स्ट्राईक रेटही 123 चा आहे, याशिवाय त्याने 3 विकेटही घेतल्या आहेत.