महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २०ऑक्टोबर । राज्यात कोरोनाचा वेग काहीसा मंदावला आहे. हा मोठा दिलासा म्हणावा लागेल. दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून हा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. मात्र आता देशासह राज्यात कोरोनाचा वेग मंदावल्याने राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावर काहीसा दिलासा दिला आहे.
राज्य सरकारने उपहारगृहे तसेच मॉलची वेळ वाढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबर अम्युझमेंट पार्क देखील सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुकानदार मालक, व्यापारी आणि उपहारगृहाचे मालकांनी दुकांनाची वेळ वाढवून मिळावी अशी मागणी केली होती. त्यापार्श्वभुमीवर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्वच ठिकाणचे उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
22 ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृहे खुली करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभुमीवर राज्यातील उपाहारगृहे तसेच दिवाळी काळात खरेदीसाठी लागणाऱ्या मॉलचा विचार करून सोमवारी मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर राज्यातील उपहारगृह तसेच दुकानांचे वेळ वाढवण्यासंबंधी निर्णय़ घेण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग कमी झाला नंतर दुकांनाची वेळ वाढवून मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. तसेच सोमवारी झालेल्या बैठकीत शरद पवार देखील उपस्थित होते. यासंदर्भात पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतरच दुकाने, उपाहारगृहांची वेळमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे तसेच नाट्यगृहे खुली करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. बुधवारपासून महाविद्यालये, तर शुक्रवारपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होणार आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता शॉपिंग मॉल, सर्व व्यापारी दुकानांची वेळ वाढवून देताना रात्री 12 पर्यंत करण्यात आली आहे.