महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑक्टोबर । कोविडच्या सावटाखाली गेली दिवाळी अंधारातच साजरी झाली. त्यामुळे महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेरखेड्यातील फटाका उद्योगाला जबर फटका बसला. मात्र, यंदा निर्बंध शिथिल झाल्याने येथील उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अगदी अलीकडे अतिवृष्टीचा फटका बसला असला तरी पुन्हा हा उद्योग त्यातून सावरत उभारी घेत आहे.
तेरखेडा येथील फटाक्यांना देशभरात मागणी आहे. गतवर्षी कोविडच्या निर्बंधामुळे हा उद्योग काहीसा कोलमडला. मात्र, यावेळी निर्बंधातून सवलत मिळाल्याने पुन्हा येथील उद्योजकांनी जोमाने कामाला सुरुवात केली आहे. यंदा किमान पाच कोटीपर्यंत उलाढाल होईल, अशी अपेक्षा कारखानदारांना आहे.
ग्रीन फटाका निर्मितीवर भर
येथील फटाका उद्योजक हे सुतळीबाॅम्ब, फुलबाजा, लक्ष्मीतोटे, तेरखेडी तोटे, आदल्या, मातीचे नळे या पारंपरिक फटाक्याची निर्मिती करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके तयार करण्यावर बंदी आणली आहे. त्यामुळे कमी आवाजाचे फटाके तयार करण्यावर भर दिला जात आहे.