महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑक्टोबर । महाराष्ट्रभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा (Historic Vasota Fort) ट्रेक शनिवार 23 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा ट्रेक सुरू होत असल्याने पर्यटक व ट्रेकर्स यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव क्षेत्रात वासोटा किल्ला वसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) काळात या किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी केला गेला.
औंधच्या पंतप्रतिनिधी संस्थानच्या काळात ताई तेलीन नावाची महिला किल्लेदार होती. तिची आणि पेशव्यांचे सरदार बापू गोखले यांच्यात या किल्ल्यावर लढाई झाल्याचे इतिहासात आढळते. दुर्गम असलेला हा किल्ला व्याघ्रगड म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रभरातील ट्रेकर्सना भुरळ घालणाऱ्या या किल्ल्याची सफर अविस्मरणीय असते. कोयनेच्या (Koyna Dam) शिवसागर जलाशयातील दीड तासांचा बोटीचा प्रवास, सभोवताली सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे (Sahyadri Tiger Project) राखीव जंगल, पशुपक्ष्यांचा मुक्त संचार अशा रम्य वातावरणात वासोट्याच्या पायथ्याला पोहोचता येतं. बामणोली येथील भैरवनाथ बोट क्लबच्या माध्यमातून बोट सेवा उपलब्ध केली जाते. पायथ्याला पोहोचल्यानंतर वन विभागाची परवानगी व आवश्यक शुल्क भरून ट्रेकला सुरुवात होते.