महाराष्ट्र 24 -मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने पुरेशी खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी भयभीत होवू नये. असे आश्वस्त करतानाच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका, होळी साजरी करताना तिचे स्वरुप मर्यादित ठेवा. मुंबई पाठोपाठ पुणे, नागपूर येथील विमानतळांवर थर्मल स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना हा जगाच्या चिंतेचा विषय बनला आहे. राज्याच्या जनतेला धीर देण्याचे काम सर्वांनी मिळून करणे आवश्यक आहे. या संदर्भात गेल्या महिन्याभरापासून आरोग्य विभागाच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाबाबात नमुने तपासण्याची सुविधा पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत केली आहे. त्यासोबतच मुंबई आणि नागपूर येथेही याची सोय करण्यात आली आहे. राज्यात आवश्यक त्या मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रसंगी खासगी रुग्णालयांची देखील मदत घेण्यात येत आहे.