महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ नोव्हेबर । कंगना रणावतने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या वतीने कंगनाच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. कंगना रणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या कंगनाच करायचं काय, खाली डोकं वर पाय, कंगना रणावत माफी मागो, कंगना रणावतचा धिक्कार अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याला जोडले मारले.
”वादग्रस्त अभिनेत्री कंगनाच्या स्टेटमेंटचा राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर निषेध करत आहे. या स्टेटमेंटला अमित शाह आणि नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. त्यांना एकूणच देशाच्या राष्ट्रपुरुषांचा इतिहास झाकायचा आहे. त्याचबरोबर एक मनुवादीवृत्ती पुढे आणायची आहे. त्यासाठी कंगना रणावतला पुढे ठेवून अशी पेरणी केली,” जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. ‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’’, असे विधान करत कंगनाने नवीन वादाला तोंड फोडले आहे. या वक्तव्यामुळं देशभरातून कंगनावर टीका केली जात आहे.
याबरोबरच ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसच्या वतीने सिंहगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. pasa कायदा १९८५ अंतर्गत कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळं देशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून, सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे .