महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ नोव्हेबर । आगामी काळात कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि सौंदर्यप्रसाधने बनवणाऱ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किमती आठ ते दहा टक्क्यांनी वाढविण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळी खर्चामुळे अनेक दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमती वाढणार आहेत, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. साहजिकच किमती वाढल्याने विविध उत्पादनांच्या मागणीवर परिणाम होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
किराणा, पर्सनल केअर, पॅकेज्ड फूड आणि डायनिंग सर्व्हिसेस पुरवणाऱ्या कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत त्यांच्या किमती वाढवल्या आहेत. नवीन वर्षात कंपन्या पुन्हा एकदा उत्पादनांच्या किंमती वाढविण्याचा विचार करू शकतात.
आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलचे व्यवस्थापकीय संचालक आशिष दीक्षित यांनी सांगितले की,”जेव्हा ऑर्गेनिक आणि मटेरिअल या दोन्ही बाबतीत महागाईचा सामना करावा लागतो, तेव्हा कंपन्यांकडे किमती वाढवण्याशिवाय पर्याय नसतो. गेल्या काही महिन्यांत किरकोळ महागाई कमी झाली असली तरी घाऊक महागाईचा दर वाढल्याने कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.
लाइफस्टाइल इंटरनॅशनलचे सीईओ देव रंजन नायर म्हणाले, “कच्च्या मालाच्या किमतीत जशी वाढ नोंदवली गेली आहे, तशी कधीच झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या मालाच्या किमती जवळपास दर महिन्याला वाढत आहेत. त्यामुळे आमच्यासमोर पर्याय उरला नाही. यापूर्वी आम्ही कच्च्या मालाच्या वाढत्या किमती स्वीकारण्याचा प्रयत्न केला, पण आता समतोल साधण्यासाठी उत्पादनाच्या किमती वाढवणे आवश्यक झाले आहे. वाढत्या इंधन आणि मालवाहतुकीच्या किमतीमुळे कंपन्याही दरात वाढ करणार आहेत.”