महाराष्ट्र 24 – नवी दिल्ली –
लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास बळकट होण्यासाठी माध्यमांची विश्वासार्हता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन BBCचे डायरेक्टर जनरल टोनी हॉल यांनी केलं आहे. ते टाईम्स ग्लोबल समिट या कार्यक्रमात नवी दिल्लीत बोलत होते.
आज इथे उपस्थित राहणं ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या आधी अगदी दोनच वर्षांपूर्वी मला दिल्लीत यायची संधी मिळाली होती. त्या वेळी आमच्या इथल्या वृत्त विभागाचा मोठा विस्तार केला जात होता आणि चार भारतीय भाषांमध्ये आमची सेवा नव्याने सुरू होणार होती, हे निमित्त साजरं करण्यासाठी मी दिल्लीत आलो होतो. या देशातील अधिकाधिक, लाखो लोकांपर्यंत बीबीसीच्या माध्यमातून विश्वासार्ह बातम्या पोचाव्यात, हे आमचं ध्येय होतं आणि आहे.
कारण, इथे असताना मला त्यांच्याशी बोलायची संधी मिळाली होती; सत्तरीच्या दशकात आणीबाणीदरम्यानचे त्यांचे अनुभव, त्यांनी भोगलेला 18 महिन्यांहून जास्त कालावधीचा तुरुंगवास, याबद्दल त्यांच्याशी बोलायला मिळालं. त्या काळात त्यांनी छुप्या मार्गाने एक छोटासा ट्रान्झिस्टर तुरुंगात आणला होता आणि सकाळी सहा वाजता, पहारेकऱ्यांना जाग यायच्या आधी त्यांना या ट्रान्झिस्टरवरून बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या बातम्या ऐकता येत असत, असं त्यांनी मला सांगितलं.
जगात काय चाललंय, आपल्या स्वतःच्या देशात काय चाललंय, हे कळून घेण्यासाठी त्यांच्याकडे हा एकमेव मार्ग उपलब्ध होता, असं ते म्हणाले. तुरुंगवासामध्ये, भयग्रस्ततेमध्ये, किंवा अस्थिरतेमध्ये जगणाऱ्या इतरही अनेकांसाठी गेली जवळपास 90 वर्षं बीबीसीचं हेच स्थान राहिलं आहे.
तूर्तास बातम्यांवरील विश्वासाच्या विषयसूत्राकडे मी परत येतो. पण सुरुवातीला मला व्यापक अर्थाने विश्वासाबद्दल बोलायचं आहे. शासन, व्यवसाय, आणि माध्यमं या लोकशाही संस्थांवरचा विश्वास. खुद्द लोकशाहीवरचा विश्वास.
अव्यवस्थेच्या या नवीन युगामध्ये काय बदल घडलेत आणि त्याला आपण माध्यमकर्मी कशा प्रकारे प्रतिसाद देऊ शकतो, याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे.