महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . 25 नोव्हेंबर । परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंह बेपत्ता होते. कोर्टानं फरार घोषित केलेले परमबीर सिंह नेमके आहेत तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. अशातच काही वेळापूर्वी परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत. परमबीर सिंह अचानक परतल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
परमबीर सिंह चंदीगडमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. परमबीर सिंह यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली होती. कोर्टानं आदेश दिल्यास चौकशीसाठी हजर राहणार असल्याचंही परमबीर सिंहांनी म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, आपण तपासाला सहकार्य करु आणि आपल्याला जे सांगायचंय ते आपण कोर्टात सांगू असं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित केलं होतं. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. त्यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं होतं. परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांना 30 दिवसांची मुदत दिली गेली होती. या 30 दिवसांत परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार होता. पण आता परमबीर सिंह परतल्यामुळं या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
फरार घोषित करणं म्हणजे, तो आरोपी स्वत:ला अटकेपासून लपवत असतो, असा न्यायालयाचा समज होतो. परमबीर सिंहांना फराराची नोटिस दिली असल्याने त्यांची सर्व मालमत्ता सील केली जाणार होती. या सील केलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा अधिकार सरकारला असतो. न्यायालयाने परमबीर सिंहांना जरी फरार घोषित केलं असलं तरी त्यांना पुढील 30 दिवसात न्यायालयात हजर राहता येतं. आपण या आधी का उपस्थित राहू शकलो नाही याचं कारण द्यावं लागेल.