महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ डिसेंबर । भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी आणि शेवटची टेस्ट शुक्रवारपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत आहे. ही टेस्ट जिंकून आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) नंबर 1 होण्याची संधी टीम इंडियाला आहे. पण, मुंबईतील हवामानामुळे भारतीय टीमची अडचण वाढली आहे. बुधवारपासून मुंबईत जोरदार पाऊस (Mumbai Rains) होत आहे. त्यामुळे दोन्ही टीमना प्रॅक्टीस देखील करता आली नाही. या पावसामध्ये वानखेडे स्टेडियमचं पिच आणि विशेषत: आऊट फिल्ड चांगलं ठेवण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’ नं दिलेल्या वृत्तानुसार हवामान विभागानं मुंबईसाठी यलो अलर्ट (Mumbai Yellow Alert) जारी केला आहे. याचा अर्थ मुंबईत पाऊस कायम राहणार आहे. सतत होणाऱ्या पावसाचा मुंबई टेस्टच्या पहिल्या दिवसाला फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जवळपास 30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, हा एक रेकॉर्ड आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरबी समुद्रातील मालदीव, लक्षद्विप या भागात चक्रीवादळाचा पट्टा निर्माण झाल्यानं हा पाऊस पडत आहे. येत्या आठवड्यातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत गुरुवारी दिवसभर पावसाची शक्यता असून संध्याकाळी काही भागात जोरदार पाऊस पडू शकतो. शुक्रवारी पावसाची शक्यता कमी आहे. पण, गुरुवारी उशीरापर्यंत पाऊस झाला तर मॅच उशीरा सुरू होऊ शकते.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये जर पावसाने खेळ खराब केला तर याचा सगळ्यात मोठा फटका भारताला बसेल, कारण ही टेस्ट सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे. पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यामुळे भारताच्या पॉईंट्समध्ये मोठं नुकसान झालं आहे. भारतात होणारी टेस्ट म्हणजे टीम इंडियासाठी हमखास पॉईंट्स मिळवण्याची संधी असते, पण न्यूझीलंडच्या टीमने भारताच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास पहिल्या टेस्टमधून हिरावून घेतला.