महाराष्ट्र २४- नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने मिनिमम बॅलेन्स चार्जच्या कटकटीतून ग्राहकांची सुटका केली आहे. त्यामुळे यापुढे स्टेट बँकेच्या ग्राहकांना आपल्या बचत खात्यामध्ये मिनिमम रक्कम नसेल तर दंड होणार नाही. आता बँकेचे ग्राहक आपल्याला हवी तितकी रक्कम बँकेत आपल्या खात्यावर ठेवू शकतात. त्यावर बँक कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही. या सोबतच बँकेकडून एसएमएस शुल्कही माफ करण्यात आले आहे. या निर्णयाचा बँकेच्या ग्राहकांना फायदा होणार आहे.
या आधी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मिनिमम बॅलेन्स शुल्क वसूल केले जात होते. मात्र सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नवीन निर्णयामुळे ४४ कोटी पेक्षा अधिक ग्राहकांना फायदा मिळण्याची शक्यता आहे.
सध्या एसबीआयच्या वेगवेगळ्या कॅटॅगरीतील बचत खातेधारकांना मिनिमम रक्कम म्हणून १००० ते ३००० रूपयांपर्यंत रक्कम ठेवावी लागत होती. मेट्रो सिटीमध्ये राहणार्या एसबीआय बचत खातेधारकांना मिनिमम बॅलेन्स म्हणून ३००० रूपये, सेमी-अर्बन बचत खातेधारकांना २००० रूपये आणि ग्रामिण भागातील बचत खातेधारकांना १००० रूपये ठेवावे लागत होते.
खातेधारकांनी जर या पध्दतीने आपल्या खात्यात ठराविक रक्कम न ठेवल्यास बँकेकडून खातेधारकांना ५ ते १५ रूपयांपर्यंत दंड वसूल केला जात होता. यावर दंड म्हणून टॅक्सही लागतो. एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांच्या मते एसबीआयच्या या नव्या घोषनेमुळे ग्राहकांचा बँकेवरील विश्वास वाढेल. त्यांच्या मते, ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने आणि ग्राहकांचे हीत लक्षात घेउन हा निर्णय घेतला आहे.