महाराष्ट्रात कोरोनाचे १४ रुग्ण; एनआयव्ही चे निदान

Spread the love

महाराष्ट्र २४- पुणे ; राज्यातील आणखी तीन जणांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) गुरुवारी केले. पुणे, मुंबई आणि ठाणे या गजबजलेल्या शहरांमध्ये हे नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कलबुर्गी येथील ७६ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीअंती सिद्ध झाले आहे. 

राज्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले पहिले दोन रुग्ण पुण्यात आढळले. त्यानंतर आतापर्यंत पुण्यात नऊ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एका रुग्णाचे निदान गुरुवारी झाले. अमेरिकेतून प्रवास करून आलेल्या ३३ वर्षीय तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती पुढे आली आहे. सिंहगड रस्त्यावरील एका सोसायटीत राहणारा हा तरुण ३ मार्च रोजी अमेरिकेवरून आला होता. त्याला कोरोनाच्या संसर्गाची लक्षणे दिसायला लागल्यानंतर बुधवारी (ता. ११) त्याला डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात दाखल केले. त्याच्या घशातील द्रव पदार्थांचे नमुने तपासण्यासाठी ‘एनआयव्ही’ला दिले होते. या अहवालातून त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे गुरुवारी सांगण्यात आले.

मुंबई, ठाण्यातील तरुण ‘पॉझिटिव्ह’
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेला आणि फ्रान्सवरून आलेल्या ठाणे येथील ३५ वर्षीय तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच, हिंदुजा येथे भरती असलेला आणि दुबईहून प्रवास करून आलेल्या ६५ वर्षीय ज्येष्ठही आज प्रयोगशाळेतील तपासणीत कोरोनाबाधित आढळला. या नवीन तीन रुग्णांमुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ झाली आहे. सर्व कोरोना बाधित रुग्णांच्या निकटवर्तीयांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू आहे. आज राज्यात ५० नवीन संशयित भरती झाले आहेत.
दीड लाख प्रवाशांची तपासणी
मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारपर्यंत एक हजार २९५ विमानांमधील एक लाख ४८ हजार ७०६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व देशांहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या तीन विमानतळांवर करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात बाधित भागातून ६८५ प्रवासी आले आहेत.

राज्यातील कोरोनाची स्थिती..
– विलगीकरण कक्षात दाखल संशयित – ३९९
– संसर्ग नसलेल्यांचा निर्वाळा – ३१७
– संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या – १४
– पुण्यात विलगीकरण केलेल्यांची संख्या – ५१
– मुंबईतील विलगीकरण कक्षातील रुग्ण – २७

बाधित भागातील प्रवाशांचा पाठपुरावा
कोरोना विषाणूंचा उद्रेक झालेल्या भागातून राज्यात आलेल्या ६८५ प्रवाशांपैकी ३८३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह गडचिरोली, नांदेड, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा, सांगली, नगर, अमरावती, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यांतूनही बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

राज्यभर
! चित्रपटांच्या चित्रीकरणालाही फटका

! पुण्यात ३० जणांची चाचणी निगेटिव्ह वैधमापन विभाग मास्कचा काळाबाजार    रोखणार

! अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर पोलिसांचे लक्ष

! नागपूरमध्ये बाधितांचा युद्धपातळीवर शोध
! कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
! कर्नाटकमध्ये दहावी परीक्षेचे वेळापत्रक बदलले
! नाशिकमध्ये पोल्ट्री व्यावसायिक शरद पवारांना भेटले
! पंढरपूरमध्ये भाविकांची देशदर्शनाकडे पाठ
! नगरमध्ये सार्वजनिक कार्यक्रम रद्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *