नंबर पोर्टेबिलिटीसाठी TRAI चे कठोर आदेश, पाहा तुमच्यावर काय परिणाम होणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .९ डिसेंबर । भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने (TRAI) मंगळवारी टेलिकॉम ऑपरेटर्सना (Telecom operators) एक कठोर सूचना केली आहे. देशातील टेलिकॉम कंपन्यांनी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी (Mobile number portability) त्वरीत एसएमएस (SMS) सुविधा सुरू करावी, असं ट्रायनं सांगितलं आहे. ही सुविधा सर्व मोबाइल वापरकर्त्यांना देण्यात यावी असं देखील सांगण्यात आलं आहे. याचाच अर्थ एखाद्या ग्राहकानं आपल्या क्रमांकावर कुठल्याही प्रकारचा रिचार्ज केलेला नसेल, तरी त्याला ही सुविधा मिळणार आहे. नेटवर्क पोर्टेबिलिटीबाबत ट्रायनं जाहीर केलेली ही सूचना महत्त्वाची मानली जात आहे.

काही टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना ‘प्रीपेड व्हाउचर’मध्ये ‘आउटगोइंग एसएमएस’ सुविधा उपलब्ध करून देत नसल्याच्या तक्रारी ट्रायकडे आल्या होत्या. त्यानंतर ट्रायनं अशा कंपन्यांच्या सेवा धोरणांवर आक्षेप नोंदवला आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांच्या प्रीपेड खात्यांमध्ये पुरेशी रक्कम असूनही त्यांना ‘मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी’ सुविधेचा लाभ घेताना अडचणी येत आहेत. पोर्टेबिलिसाठी आवश्यक असलेला युनिक पोर्टिंग कोड (Unique porting code) मिळवण्यासाठी निश्चित केलेल्या 1900 या क्रमांकावर त्यांना एसएमएस पाठवता येत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक तक्रारी ट्रायकडे आल्या आहेत.

ट्रायनं जाहीर केलेल्या आपल्या सूचना पत्रात म्हटलं आहे की, ‘ग्राहकांना सेवा देणाऱ्या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी, मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी रेग्युलेशन, 2009 (Mobile Number Portability Regulation, 2009) अंतर्गत प्रीपेड (Prepaid) आणि पोस्टपेड (Post-paid) अशा दोन्ही श्रेणीतील मोबाइल फोन पोर्टेबिलिटी सुविधा द्याव्यात. ग्राहक वापरत असलेल्या व्हाउचरची किंमत विचारात न घेता, सर्वांना यूपीसीसंबंधित एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जावी. प्रीपेड व्हाउचर किंवा प्लॅनमध्ये मोबाइल नंबर पार्टेबिलिटीशी संबंधित एसएमएस पाठवण्याच्या सुविधेची तरतूद न करणं हे नियमांचं उल्लंघन असल्याचं ट्रायनं म्हटलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स जिओनं (Reliance Jio) ट्रायकडं तक्रार केली होती की, वोडाफोन आयडियाच्या नवीन टेरिफ प्लॅन्समुळं काही ग्राहकांनी कमी किमतीच्या प्लॅनची निवड केली आहे. अशा ग्राहकांना त्यांचा मोबाइल नंबर ‘पोर्ट’ करण्यास अडचण येत आहे. कारण कंपनीच्या सुरुवातीच्या प्लॅनमध्ये ‘आउटगोइंग एसएमएस’ सुविधेचा समावेशच नाही. जिओच्या तक्रारीनुसार, वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) फक्त 179 रुपये आणि त्यापेक्षा जास्त रुपयांच्या प्लॅनमध्ये एसएमएस सेवा देत आहे.

वोडाफोन आयडियाने नोव्हेंबरमध्ये आपल्या मोबाइल सेवा आणि इंटरनेट दरांमध्ये 18 ते 25 टक्यांनी वाढ केली होती. नवीन दरांनुसार, कंपनीने 28 दिवसांची वॅलिडीटी असलेला पूर्वीचा 75 रुपयांचा प्लॅन 99 रुपयांना केला आहे. मात्र, किंमत वाढवूनही त्यात एसएमएस सेवेचा समावेश केलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *