महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ डिसेंबर । महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा तुफान फॉर्मात आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्यानं सलग तिररे शतक झळकावले. पहिल्या दोन लढतीत ऋतुराजनं धावांचा पाठलाग करताना मध्य प्रदेश व छत्तीसगड यांच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. आज त्यानं प्रथम फलंदाजी करताना केरळ संघाविरुद्ध शतक झळकावलं. राहुल त्रिपाठीही सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसतोय. आजच्या सामन्यात तो ९९ धावांवर माघारी परतला.
केरळ संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना वाय नाहर ( २) व अंकित बावणे ( ९) हे लगेच माघारी परतले. त्यानंतर ऋतुराज व राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी करून २ बाद २२ वरून संघाला २१७ धावांपर्यंत मजल मारून दिली. राहुल १०८ चेंडूंत ११ चौकारांसह ९९ धावांवर बाद झाला. पण, तुफान फॉर्मात असलेल्या ऋतुराजनं शतक पूर्ण केलं. ऋतुराज १२९ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह १२४ धावांवर बाद झाला.
दरम्यान, कर्णधार ऋतुराजनं छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात १४३ चेंडूंत नाबाद १५४ धावा चोपल्या होत्या. त्यातील ८६ धावा या १४ चौकार व ५ षटकार अशा १९ चेंडूंत जोडल्या गेल्या. छत्तीसगडच्या गोलंदाजांची धुलाई करताना महाराष्ट्राला ८ विकेट्सनं विजय मिळवून दिला. मध्य प्रदेश विरुद्ध ३२९ धावांचा पाठलाग करताना ऋतुराजनं ११२ चेंडूंत १४ चौकार व ४ षटकारांसह १३६ धावा केल्या होत्या आणि छत्तीसगडविरुद्ध २७६ धावांचा पाठलाग करताना त्यानं निम्म्या धावा केल्या होत्या.