महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ डिसेंबर । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या बेधडक शैलीतील भाषणांमुळं नेहमी चर्चेत असतात. आजही त्यांनी एक वक्तव्य केलंय ज्याची चर्चा होतेय. देशात दोन गोष्टीवर फार प्रयत्न करावा लागत नाही एक लोकसंख्या आणि दुसरी ऑटोमोबाईल ग्रोथ, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. रस्ते विकासात गुंतवणुकीच्या संधी या विषयावर नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. दोन वर्षात इलेक्ट्रॉनिक कार आणि बाईकची किंमत पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांच्या किमती एवढी होईल, असं देखील गडकरी यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, 1995 ला आम्ही गुंतवणूकदारांकडे जात होतो मात्र आता गुंतवणूकदार आमच्याकडे येत आहेत. 1994 जेव्हा मी नवीन मंत्री झालो होतो तेव्हा माझ्याकडे नवीन टीव्ही माझ्याकडे आला होता. मी पुण्यात एका दुकानात गेलो होतो आणि दुकानदाराला म्हणालो मला इंस्टॉलमेंट टीव्ही द्या. त्यावेळी मी सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो. इंस्टॉलमेंट टीव्ही घेणारा मी कदाचित पहिलाच मंत्री असेन, असं गडकरी म्हणाले. त्यांनी म्हटलं की, त्या दुकानदाराला समजले तेव्हा तो म्हणाला साहेब मी तुम्हाला नवीन पिस आला की देतो. पण तो टीव्ही काही मला मिळाला नाही. त्यावेळी मी विचार केला जर टीव्ही इंस्टॉलमेंटवर मिळू शकतो तर रोड का नाही मिळत. त्यावर मी विचार केला आणि पहिला ठाणे-भिवंडी बायपास बनवला, असं गडकरींनी सांगितलं.
नितीन गडकरी म्हणाले की, वरळी वांद्रे हा प्रोजेक्ट 420 कोटी होता. नंतर तो प्रोजेक्ट साडे आठशे कोटींवर गेला. गुंतवणूकदारांची व्याप्ती आम्ही येत्या काळात वाढवत आहोत. यामुळे अनेक प्रोजेक्टची पूर्तता देखील लवकर होण्यास मदत होईल. आता 12 तासात रस्त्याने मुंबई ते दिल्ली जाता येईल. अगरबत्तीच्या काड्या आधी चीनमधून आयात व्हायच्या. मात्र त्रिपुरातून नागपूरमध्ये अगरबत्तीच्या काड्या आणल्या. ज्यामुळे कॉस्ट खर्चही वाचला. हे फक्त एक उदाहरण आहे असे अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील, असंही गडकरी म्हणाले.