Coronavirus Restrictions: राज्यातील करोना निर्बंध आणखी कठोर होणार का ? राजेश टोपे म्हणाले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .९ जानेवारी । राज्यात सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध हे मोठ्या स्वरुपाचे आहेत. रुग्णसंख्या कितीही वाढली तरी जोपर्यंत ऑक्सिजन आणि रुग्णालयांतील खाटांची मागणी एक निर्धारित मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत हे निर्बंध आणखी कठोर करण्याची गरज नाही. किंबहुना याच निर्बंधांमुळे राज्यातील करोना रुग्णांचा आकडा नियंत्रणात येईल, अशी आशा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केली. ते रविवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी राजेश टोपे यांना राज्यातील करोनाच्या सद्यपरिस्थितीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर राजेश टोपे यांनी म्हटले की, सध्या राज्यातील ऑक्सिजनची मागणी २७० मेट्रिक टनवरुन ३५० मेट्रिक टन इतकी झाली आहे. मात्र, हे कोव्हिड आणि नॉन-कोव्हिड रुग्णांसाठी लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनचे प्रमाण आहे. यापूर्वी करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण दिवसाला लागणाऱ्या १७०० ते १८०० मेट्रिक टनची मागणी पूर्ण केली आहे. सध्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना कमी प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागत आहे. त्यावरुन सध्याचा करोना विषाणू सौम्य स्वरुपाचा वाटत आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले.

सरकारला क्लासपेक्षा (शाळा) ग्लासची जास्त चिंता आहे, या भाजपच्या टीकेलाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्युत्तर दिले. गर्दी होणाऱ्या प्रत्येक ठिकाणी राज्य सरकार निर्बंध लावणार आहे. त्यामुळे वाईन शॉप आणि दारुच्या दुकानांमध्ये गर्दी होत असेल तर तीदेखील बंद केली जातील, असे राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच करोनामुळे लहान मुलांना डायबेटिस होण्याचे प्रमाण वाढत असल्याबद्दल आयसीएमआरने कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. केंद्र सरकारकडून तशा सूचना आल्यास राज्य सरकार योग्य ती काळजी घेईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री राज्य सरकारकडून नवे निर्बंध जाहीर करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रात अखेर रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्यात आली आहे. रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसेल. तसेच दिवसभर जमावबंदीही लागू असेल. त्यामुळे पाचपेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही. तर जिम, स्पा आणि स्विमींग पूलही पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. तर खासगी कार्यालये, हॉटेल्स, नाट्यगृह, थिएटर्स आणि सलून्स ५० टक्के क्षमतेने चालवता येणार आहेत. तर मॉल्स सकाळी १० ते रात्री ८ या वेळेतच सुरु ठेवता येतील. तर मैदाने, उद्याने आणि पर्यटनस्थळेही पूर्णपणे बंद राहणार आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनवर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. ही नियमावली रविवारी मध्यरात्रीपासून अंमलात आणली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *