महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात कोरोना व्हायरसचा फैलाव वेगाने होत आहे. मात्र, तरीही नागरिक या समस्येला तितकेसे गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. एवढेच काय परदेशातून परतल्यामुळे होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आलेले नागरिकही बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता यापुढे परदेशातून येणाऱ्या नागरिकांना विमानतळापासून घरी सोडण्याची व्यवस्था सरकारकडूनच करण्यात येणार आहे. अर्थात यासाठीचे पैसे संबंधित प्रवाशांनाच भरावे लागणार आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयानुसार विमानतळापासून ३०० किलोमीटरच्या अंतरापर्यंत जास्त प्रवासी राहत असतील तर त्यांच्यासाठी बसची सोय करण्यात येईल. मात्र, प्रवाशांची संख्या कमी असेल किंवा एखाद्याचे घर ३०० किमीपेक्षा जास्त अंतरावर असेल तर अशा प्रवाशांसाठी टॅक्सीची सोय करण्यात येईल. या सगळ्याचे पैसे संबंधित प्रवाशांनाच चुकते करावे लागणार आहेत. यासाठी सरकारकडून उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना १५ ते २५ नॉन एसी बसेस आणि २० ते २५ टॅक्सी सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.