महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १५ जानेवारी । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात माध्यमांशी बोलताना राज्यातील जनतेला एक सूचक इशारा दिल्याचे दिसून आले. जर राज्यात ७०० मेट्रिक टनापेक्षाही जास्त ऑक्सिजनची मागणी निर्माण झाली, तर मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अजित पवार यांनी बोलून दाखवले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीच कोरोना संदर्भातील राज्य स्तरावरील निर्णय हे घेतात. मंत्री महोदयांनी त्याच्याबाबतची नियमावली जाहीर केलेली आहे. पण रूग्ण संख्या वाढत आहे, बहुतेक जण घरीच थांबून उपचार घेत आहेत. त्याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारचा आरोग्य विभागही वेळोवेळी माहिती देत आहे. परंतु, हे सगळे होत असताना, जर उद्या ऑक्सिजन बेड्सची मागणी मोठ्याप्रमाणावर सुरू झाली आणि ७०० मेट्रिक टनापेक्षा जास्त ऑक्सिजनची मागणी राज्यात झाली, तर मग मात्र त्या संदर्भात मुख्यमंत्री कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.